आनंदपीठ'ला फॉलो करा :

बातम्या

आनंदपीठाचा संस्थापक सदस्य भालूचे निधन

आनंदपीठाचा संस्थापक सदस्य असलेल्या भालूचे अकस्मात दु:खद निधन झाले. सोमवारी संध्याकाळी जंगलात मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे यांनी अभंगातून भालूला अंतिम निरोप दिला.

आनंदपीठासाठीची जागा पाहण्याच्या दिवसापासून तो संस्थापकांसोबत होता. गावातून आनंदपीठाकडे चालत आलेला भालू स्वत:हून आनंदपीठाचा सदस्य बनला. त्याच्यासोबत तुफानही आनंदपीठाचा सदस्य झाला. दोन-तीन दिवस भालू आनंदपीठावर नव्हता. अनेकदा तो दोन दिवसांसाठी आनंदपीठ सोडून जायचा. पुन्हा यायचा. यावेळी पण असेच झाले असावे, असे आनंदपीठाच्या इतर सदस्यांना वाटले. अचानकपणे त्याचा मृतदेह जंगलात असल्याची माहिती एका गावकऱ्याने सुंदरअण्णांना दिली. आनंदपीठाचे सदस्य तिथे पोहोचले. पण तोपर्यंत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्याची ओळख पटणेही कठीण झाले होते. त्यामुळे दहन किंवा दफन करणे कठीण होते. त्यामुळे आहे त्या नैसर्गिक स्थितीत त्याला अंतिम निरोप देण्याचे ठरले. भंडारा, पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रद्घांजली वाहण्यात आली.

दरम्यान, भालूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण समोर येऊ शकले नाही. रानडुक्करांचा हल्ला, सर्पदंश की अन्य काही मानवी कारणांनी हे घडले, हे सांगता येणे या टप्प्यावर तरी शक्य नाही.

भालूशिवाय आनंदपीठाची कल्पना करणे कठीण आहे. त्याच्या मृत्यूचे दु:ख पचवण्याची ताकद सर्वांना मिळो ही प्रार्थना.